राज्यात चार दिवस वादळी वार्‍यासह पाऊस   

काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट 

पुणे : एकीकडे मान्सूनचे वाटचाल वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे मागील आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कायम आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात  वादळी वार्‍यासह जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी, तर विदर्भात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पावसाला सुरूवात झाल्यानंतर सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा शहर व घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, सोलापूर, धाराशिव येथे दोन दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील चार दिवस मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
पुण्यात पाऊस कायम...
 
पुणे शहर आणि परिसरात पुढील चार दिवस मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. रविवारी सायंकाळी पुण्यात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे काही काळ सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मध्य वस्तीतील काही रस्त्यांवर वाहतूक कोंडीही झाली. येत्या शनिवारपर्यंत शहरात ढगाळ वातावरण आणि पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात घाट विभागात पाऊस कायम असणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कायम आहे. 

मान्सूनची प्रगती कायम 

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी संपूर्ण अंदमान व्यापले आहे. मान्सूनच्या वाटचालीला पोषक स्थिती असल्याने निम्या श्रीलंकेपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. अंदमान समुद्र, अंदमान बेटे, मालदिव, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही काल मान्सूनने प्रगती केली आहे. मान्सूनमुळे या भागात पाऊस कायम आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूने मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे यावेळी नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे २६ मे पर्यंत मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
 

Related Articles